गणपती कोकण-बेळगाव ट्रीप - भाग तिसरा.

मस्त आराम करून आम्ही सकाळी उठलो, मला तसे बरे वाटत होते पण एकदम व्यवस्थित नाही. म्हणून मी जरा नाश्त्या वर आवर घेतला. काल तब्बेती मुळे व्यवस्थित देवाचे दर्शन घेता आले नव्हते. म्हणून आता शांतपणे सहपरिवार देवाचे दर्शन घेतले.


माझ्या वरती परत एकदा औषधांचे प्रयोग झाले आणि निघण्याच्या तयारीला लागलो. निघण्यापूर्वी बऱ्याच चर्चा झाल्या. कोल्हापूरला आईच्या काकान कडे जाऊन मग बेळगावला जायचे कि सरळ बेळगावला जायचे. चर्चांती सरळ बेळगाव असे ठरले कारण आईची आणि माझी हेंल्थ बोंबलली होती.

बरेच वर्षापासून मला आंबोली घाटातून जायचे होते आणि आता जायची संधी आली तर माझी हेंल्थ बोंबलली होती. जाऊ परत कधी तरी असे म्हणून मी खोटे समाधान मानले आणि बेळगावच्या प्रवासाला लागलो. कसाल महामार्गापर्येंत मी कशीबशी गाडी चालवली नंतर शिवराम दळवी काकांनी त्यांच्या कडच्या एका ड्रायवरला माझी गाडी चालवायला सांगितली. आम्ही सर्व मग त्यांच्या गाडीतून आंबोली पर्येंत गेलो.

आंबोली घाटात गाडी चालवायच माझे स्वप्न अजूनही अपूर्ण राहिले. परंतु आंबोली घाटातली मज्जा मी लुटत होतो. जस-जसे घाट चढत होतो तस-तसे हवेत थंडावा वाढत होतो. घाटाच्या मध्ये लागलेला हा धबधबा.....
घाटात शिवराम दळवी काकांचे हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलचा फेर-फटका मारला आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. चहा घेऊन काकांचा निरोप घेतला आणि बेळगावच्या दिशेने निघालो. मध्येच रस्त्यात लगत धबधबा असा मला बोर्ड दिसला, पण धबधबा कुठेही मला दिसत नव्हता. गाडी थांबवली आणि बंद केलीच तोच धबधब्याचा आवाज आला. कड्यावर जाऊन पहिले तर हा धबधबा दिसला.

आंबोली ते बेळगाव अंतर तसे फार नाही पण आईच्या आणि माझ्या तब्बेतीच्या अभावे जरा हळू-हळू चालवत होतो. ५ च्या दरम्यान आम्ही बेळगावला पोहोचलो.

बेळगावात ३ दिवस राहिलो आणि आराम केला सर्वांनी. मध्ये एकदा बेळगाव जवळ गोवा रोड वर ४० किलो मीटर वर वराह-नरसिंहाच मंदिर पाहायला गेलो होतो. तिकडचे हे काही फोटो....



बेळगावात फक्त भजन आणि भोजन असे ३ दिवस राहून आम्ही मुंबई साठी निघलो. बेळगाव सोडले आणि NH-4 वर काढलेला हा फोटो...

आईच्या हेल्थ मुळे आम्ही थांबत-थांबत मुंबई कडे प्रयाण करत होतो. कोल्हापूर, सातारा इथे थांबून संध्याकाळी ५च्या दरम्यान आम्ही पुण्यात माझ्या काकांकडे होतो. बेळगाव ते पुणे थांबत-थांबत सुद्धा तसा बराच प्रवास झाला होतो. पुण्याला काकांकडे आईला झोपवले आणि मी पण आराम करून घेतला. रात्री ९ ला आम्ही पुणे सोडले आणि १ च्या दरम्यान मुंबईत आलो. परत तेच आयुष्य जगायला........